Wy/mr/रामटेक

< Wy‎ | mr
Wy > mr > रामटेक

इतिहास edit

राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.

इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते.इ.स. ३५०मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झालेत असा समज आहे.संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'शाकुंतल'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने 'कालिदास स्मारकाची' निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी 'कालिदास महोत्सव साजरा होत असतो.

जवळच, तोतलाडोह हे धरण आहे.रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.

रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.मनसर येथे महाविहार होता असे उत्खननात आढळून आले आहे. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात.

थोडक्यात edit

रामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी किंवा शेंदराचा डोंगर व तपोगिरी किंवा तपस्या करण्याचा डोंगर नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे.शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.

संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.

आख्यायिका edit

आख्यायिकेप्रमाणे हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जपजाप्य केले . वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शंबूकाने केलेल्या गैरवापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शंबूकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शंबूकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर येथील शंबूकाच्या मूर्तीची पूजा रामाबरोबरीने होते.

देऊलवाडा edit

नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.


आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत द्रुग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.

मध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे.

यात्रा व जत्रा edit

रामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. रामाच्या देवळावर त्रिपूर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.


एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तुकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.


हेही बघा edit